राजकारणाचा ‘खेळ’ शिरसाटांना उमगलाच नाही? चूक केली चक्रव्यूहात अडकले अन्..

Sanjay Shirsat Controversy : संजय शिरसाट. शिंदे सरकारमधील रुबाबदार मंत्री. एकनाथ शिंदेंचे उजवे हात. पण, मागील काही दिवसांपासून राजकीय चक्रव्यूहात असे अडकले आहेत की नुसता तोंड दाबून बुक्क्यांचा मार. याच अवस्थेत असेही काही शब्द बोलून गेले त्यामुळे अधिकच घेरले गेले आहेत. ज्या पक्षात त्यांची कारकीर्द घडली त्याच पक्षाच्या पूर्वाश्रमीच्या नेतृत्वाविरोधात आक्रमक होणारे शिरसाट आता पुरते बॅकफूटवर गेले आहेत. फक्त एक चूक आणि काही विसंगत गोष्टी याला कारणीभूत ठरल्या आहेत. या राजकारणाचा थोडक्यात आढावा घेऊ या..
अजित पवार महायुतीत आल्यापासून शिवसेना आणि राष्ट्रवादीत खटके उडत होते. यात संजय शिरसाट आघाडीवर होते. त्यांच्या सामाजिक न्याय खात्याचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आल्यानंतर त्यांची चिडचिड जास्तच वाढली होती. शिरसाट सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आहेत. त्यांच्या खात्याचा निधी या योजनेसाठी वळवण्यात आला होता. यामुळे शिरसाट भडकले आणि त्यांनी थेट अजितदादांशीच पंगा घेतला. निधी वळवण्याच्या या निर्णयावर त्यांनी थेट प्रसारमाध्यमांतून नाराजी व्यक्त केली. ही त्यांची चूकच म्हणावी लागेल. कारण यात त्यांनी अजितदादांची नाराजी तर घेतलीच शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही रोष ओढवून घेतला.
ठाकरे बंधू एकत्र! गिरगावात बॅनर लागले, ‘मराठी माणसाला वाचवा, आठ करोड जनता…’
यानंतर थोड्याच दिवसांत शिरसाट यांच्या मुलाचे प्रकरण बाहेर आले. एका महिलेने त्यांच्या मुलावर अत्यंत गंभीर आरोप केले. या प्रकरणाला मीडियात चांगली प्रसिद्धी मिळाली. शिरसाट यांची कोंडी झाली. प्रकरण वाढणार असे वाटत असतानाच अवघ्या दोन दिवसांत प्रकरण शांत झाले. आरोप करणाऱ्या महिलेने सर्व आरोप मागे घेतले. प्रकरण शांत करण्यात शिरसाट यांना यश मिळालं खरं. पण, यानंतर लगेचच नवीन प्रकरण त्यांची वाट पाहतच होतं.
छत्रपती संभाजीनगर येथील एका हॉटेल लिलाव प्रक्रियेत त्यांनी सहभाग घेतला होता. शिरसाट यांच्यासाठी नियम शिथील करण्यात आल्याचे आरोप झाले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हे प्रकरण लावून धरले. त्यांच्या आरोपांना उत्तर देताना शिरसाट यांचाही तोल ढळला. “मी थोडा चक्रम आहे, घराला आग लावायलाही मागेपुढे पाहणार नाही” असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. या वक्तव्याने त्यांचीच नाचक्की झाली. यात संजय शिरसाट विरोधकांच्या सापळ्यात अडकल्याचंही दिसून आलं. यानंतर आणखी एक प्रकरण त्यांच्या मागे लागलं.
शिरसाट यांनी एमआयडीसीतील आरक्षित जागा खरेदी केली. त्यासाठी आरक्षण उठवण्यात आले असा आरोप एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला. या प्रकरणात शिरसाट बॅकफूटवर आहेत. इतकेच नाही तर त्यांच्या पक्षातील सहकारी देखील त्यांच्या पाठीशी दिसत नाहीत. शिरसाट छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. यातच ते एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झालं आहे.
स्थानिक राजकारण मुळाशी..
स्थानिक राजकारणात वावरत असताना शिरसाटांनी पाण्यात राहून माशांशी वैर घेतलं. अब्दुल सत्तार जिल्ह्याचे पालकमंत्री असताना शिरसाट यांनी त्यांची चांगलीच अडचण केली होती. यानंतर शिरसाट जेव्हा पालकमंत्री झाले तेव्हा त्यांनी सत्तार यांच्या काही निर्णयांना स्थगिती दिली. याच जिल्ह्यात भाजपाचे अतुल सावे मंत्री आहेत. पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत सावे यांचंही नाव होतं. पण, यात शिरसाटांनी बाजी मारली. त्यामुळे आता शिरसाट आणि सावे यांच्यात फारसं सख्य राहिलेलं नाही.
विधानसभेची ‘मॅच’ खरंच ‘फिक्स’ होती का ? राहुल गांधी विरुद्ध बावनकुळे
स्वपक्षातील अब्दुल सत्तार यांच्याशी त्यांचे पटत नाही. प्रदीप जैस्वाल यांच्याशीही छत्तीसचा आकडा आहे. येथील स्थानिक राजकारणाचा कानोसा घेतला तर छ. संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून शिरसाट विजयी झाले आहेत. मध्य मतदारसंघात शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल आमदार आहेत. या दोन्ही मतदारसंघात भाजप वाढायचा असेल तर शिवसेनेला मागे ढकलावं लागणार आहे. यामुळेच शिरसाट यांची कोंडी तर होत नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राजकारण जपून करावं लागतं ही गोष्ट शिरसाट यांच्या लक्षात आल्याचं दिसत नाही. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतल्या दोन्ही पक्षांवर चांगलं नियंत्रण मिळवलं आहे. अजितदादा किंवा एकनाथ शिंदे दोघेही सत्ता सोडून जाणार नाहीत याची त्यांना खात्री आहे. जरी या दोघांनी साथ सोडली तर सरकार संकटात येणार नाही याची जाणीव फडणवीसांना आहे. याच गोष्टीची जाणीव शिरसाटांना मात्र दिसत नाही. अजित पवार यांच्यावरील टीका असो किंवा अन्य वक्तव्ये असोत याच गोष्टी आता मंत्री संजय शिरसाट यांच्यासाठी अडचणीच्या ठरल्या आहेत. या गोष्टी त्यांच्या लवकर लक्षात आल्या तर बरं नाहीतर..